मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव नगरपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये घरगुती नळांना मोटार पंप लावून पाणी ओढून घेतले जात असल्याने इतर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
मारेगाव शहरात एकूण १७ प्रभाग (वार्ड) असून अनेक ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतीकडून ठरावीक वेळेत प्रत्येक वार्डमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक नागरिकांच्या नळांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे काही नागरिकांनी आपल्या घरगुती नळांवर मोटार पंप बसवून थेट पाणी ओढून घेण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे जलवाहिन्यांमधील दाब कमी होऊन इतर भागांतील नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रकार शहरातील अनेक वार्डांमध्ये सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे आधीच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकांना पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी मिळत नसल्याने दूरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.
प्रत्येक नागरिकाला समान व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाने विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. मात्र काही नागरिकांकडून मोटार पंपांचा गैरवापर करून पाणी ओढले जात असल्याने या योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. हा प्रकार नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घरगुती व सार्वजनिक नळांवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेल्या मोटार पंपांवर कारवाई करावी तसेच सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणीपुरवठा मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मारेगावकरांनी केली आहे.








