कुरुंदवाड | प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुरुंदवाड नगरीच्या वतीने अण्णासाहेब चौगुले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे होत्या.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अण्णासाहेब चौगुले यांच्या शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत, आधुनिक शेती पद्धती स्वीकारून त्यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अण्णासाहेब चौगुले यांच्या संघर्षमय राजकीय व शेतकरी चळवळीतील योगदानाचे कौतुक करत, त्यांचे माणुसकीचे नाते आणि विविध नेत्यांशी असलेले आपुलकीचे संबंध अधोरेखित केले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीत अण्णासाहेबांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, आंदोलने, संघर्ष आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांनी शेतीतील आधुनिकतेचा स्वीकार करून उत्पन्नवाढीचे नवे मार्ग दाखवले, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात प्रास्ताविक माजी प्राचार्य भाऊसाहेब सावगावे यांनी केले, तर स्वागत माजी नगराध्यक्ष आप्पासो जोंग यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब नदाफ यांनी केले, तर आभार मोनापा चौगुले यांनी मानले.
या सोहळ्याला कुरुंदवाड परिसरातील आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








