अक्राणी | प्रतिनिधी
दैनिक “दक्ष महाराष्ट्र” मध्ये प्रसिद्ध झालेल्या पेसा व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहाराच्या आरोपांचे आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कागदोपत्री पुराव्यांसह खंडन केले आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे व एकतर्फी असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. २६ जानेवारी २०२५ आणि १ मे २०२५ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांच्या नोटीस, उपस्थिती रजिस्टर तसेच मंजूर ठरावांच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. काही विषय कोरमअभावी तहकूब झाले असले तरी “ग्रामसभा झालीच नाही” हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पेसा निधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा दुरुस्ती, अंगणवाडी इमारत रंगकाम, अंतर्गत काँक्रीट रस्ते व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अशी विकासकामे पूर्ण झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व बिले, मोजमाप पुस्तिका व व्हाउचर लेखापरीक्षणासाठी सादर करण्यात आल्याचे तसेच सोशल ऑडिटमध्येही नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले “तीन वर्षात विकासकामे नाहीत” हे आरोपही निराधार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही घटकांकडून राजकीय हेतूने ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोपही सरपंचांनी केला आहे. पेसा कायदा २०१४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे.
“कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली तरी आम्ही पूर्ण सहकार्य करू. प्रत्येक रुपयाचा हिशेब पारदर्शक आहे,” अशी ठाम भूमिका सरपंच व ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे.











