श्रीगोंदा | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला श्रीगोंदा तालुक्यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. धाडगेवाडी ते चांभुर्डी या 2.900 किमी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे.
या रस्त्याचे सुमारे 2 किमीहून अधिक काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी गटारलाइन न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. तर केवळ 500 ते 600 मीटर अंतराचे काम अर्धवट सोडून संबंधित ठेकेदाराने काम बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चांभुर्डी गावाजवळील अर्धा किलोमीटर रस्ता अद्याप अपूर्ण असल्याने या मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात चिखल व मोठमोठे खड्डे पडत असल्याने वाहतूक धोकादायक बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कामांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणा व गुणवत्ता नियंत्रण पथक असतानाही काम अर्धवट राहणे आणि त्यावर कारवाई न होणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“ठेकेदाराने पूर्ण बिल उचलले आहे का? काम अपूर्ण असतानाही त्याला अभय दिले जात आहे का?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करत रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे.











