नवी मुंबई | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या गढूळ पाणीपुरवठा समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत महापौरांकडे तातडीचा पाठपुरावा सुरू केला आहे. नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापौरांकडे निवेदन सादर करून सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती तथा नगरसेवक गिरीश कान्हा म्हात्रे, नगरसेविका सौ. प्रितीताई भोपी तसेच समाजसेवक चंद्रशेखर भोपी उपस्थित होते. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची माहिती महापौरांना देत पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान ही समस्या आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. गढूळ पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून संबंधित विभागाने तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
महापौरांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या असून समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले.
प्रभागातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही; स्वच्छ पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे.”









