गुहागर | दि. ७ जून २०२६
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर आमदार प्रमोद जठार यांनी शिवप्रेमींसह गडाच्या संरक्षण व संवर्धनाची शपथ घेतली. “गडाचे संरक्षण हीच प्रत्येक शिवभक्ताची जबाबदारी आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अलीकडेच गोपाळगड किल्ल्याच्या कथित मालकी हक्कासंदर्भातील वादग्रस्त प्रकरण सोशल मीडियावर समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर हा किल्ला जनतेचा ऐतिहासिक वारसा असल्याची भूमिका पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांनीही गोपाळगड हा जनतेचा वारसा असल्याचे सांगत त्याच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. यानंतर प्रशासन स्तरावर किल्ला राज्य शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिवभक्तांचा मोठा सहभाग
या कार्यक्रमाला भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नेते वैभव खेडेकर, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, नगराध्यक्षा नीता मालप, राजेश बेंडल, तालुका सरचिटणीस सचिन ओक, यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
गड संवर्धनाची सामूहिक जबाबदारी
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोपाळगड हे केवळ ऐतिहासिक स्मारक नसून कोकणातील शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले. या किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
गोपाळगड संवर्धनाचा मुद्दा आता स्थानिक मर्यादेपलीकडे जाऊन व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.








