कन्नड /प्रतिनिधी
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याची तब्बल २४ वर्षे समर्पित करून ताडपिंपळगावचे सुपुत्र, वीर जवान श्री. बजरंग अर्जुन मगरे हे भारतीय सैन्यातून (सेवाकाळ: २९/२००२ ते ३१/२०२६) सन्मानाने सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी परतले. या निमित्ताने संपूर्ण ताडपिंपळगाव आणि परिसराच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असे ‘जंगी स्वागत’ करण्यात आले. आपल्या लाडक्या वीर पुत्राच्या स्वागतासाठी अवघे गाव जणू एकत्र आले होते.
श्री. बजरंग मगरे यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि हवेत फडकणारे तिरंगे यांमुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जवान बजरंग मगरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकीदरम्यान गावातील माता-भगिनींनी ठिकठिकाणी आरती ओवाळून आणि टिळा लावून या वीर जवानाचे औक्षण केले. घराघरांवरून आणि रस्त्यांवरून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. देशसेवेचे हे कठीण व्रत यशस्वीरीत्या पूर्ण करून सुखरूप घरी परतलेल्या आपल्या सुपुत्राला पाहून अनेक ग्रामस्थांचे डोळे अभिमानाने आणि आनंदाश्रूंनी भरून आले होते.
मिरवणुकीनंतर गावातील मुख्य चौकात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या वतीने श्री. बजरंग अर्जुन मगरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी व परिवाराचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
”माझ्या गावाकडून मिळालेले हे प्रेम आणि सन्मान पाहून मी भारावून गेलो आहे. सीमेवर असताना गावातील मातीची आणि माणसांची आठवण नेहमीच ताकद द्यायची. आज मिळालेला हा सत्कार माझ्या २४ वर्षांच्या सेवेचे सार्थक करणारा आहे,” असे भावुक उद्गार यावेळी जवान बजरंग मगरे यांनी काढले.
या जंगी स्वागत सोहळ्याला ताडपिंपळगाव व परिसरातील आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळी, महिला आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच मगरे सरांना भेटून त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. २४ वर्षे देशाची अविरत सेवा करून गावाची मान अभिमानाने उंचवणाऱ्या या वीर जवानाचा स्वागत सोहळा पार पडला









