शिरूर | प्रतिनिधी
आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकृतपणे साजरी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके तसेच आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाला ई-मेलद्वारे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीन यांच्या संरक्षणासाठी आणि अन्यायाविरोधातील संघर्षासाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी राज्य शासनाने विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शैलेश जाधव यांनी निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
- राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याबाबत शासन परिपत्रक जारी करावे.
- शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.
- ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरापर्यंत जयंती साजरी करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत.
- आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाबाबत जनजागृती अभियान राबवावे.
- राज्यस्तरीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून युवा पिढीपर्यंत त्यांच्या कार्याचा संदेश पोहोचवावा.
भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सन्मान आणि आदिवासी इतिहासाचे जतन करण्याच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शैलेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासी समाजाच्या स्वाभिमान, हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही मागणी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.






