मारेगाव, प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा धानोरकर आणि आशिष धानोरकर (रा. सगनापूर) यांचा विवाह ४ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. संसाराला सुरुवात करून अवघा महिनाच झाला असताना त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोघांचे मृतदेह गावाजवळील शेत परिसरात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आले.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सगनापूर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.










