अक्राणी प्रतिनिधी | नंदुरबार | १० जून
धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग आणि पेसा (PESA) निधीच्या कथित गैरव्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या जुन्या आणि नव्या कारभाराभोवती संशयाचे सावट निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी विकास निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषद प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या सत्ताधारी गटानेही स्वतःहून जुन्या कार्यकाळातील खर्चाची सखोल चौकशी करण्याचे आव्हान प्रशासनाला दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१४ ते २०२१ या कालावधीत घाटली ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून तसेच पेसा अंतर्गत विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. मात्र, त्या निधीतून प्रत्यक्षात कोणती विकासकामे झाली, निधीचा वापर नेमका कुठे करण्यात आला आणि त्याचे परिणाम गावात का दिसून आले नाहीत, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
काम न करताच निधी खर्च दाखवल्याचा आरोप
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कालावधीत विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च दाखविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात गावात अपेक्षित कामे झालेली दिसून येत नाहीत. अनेक कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
१४ मुद्द्यांवर माहिती मागविण्याची मागणी
या प्रकरणात ग्रामस्थांनी आणि सध्याच्या सत्ताधारी गटाने प्रशासनाकडे सविस्तर माहिती मागितली असून त्यामध्ये १४ वा वित्त आयोग व पेसा निधीचे संपूर्ण विवरण, बँक खात्यांचे स्टेटमेंट, मंजूर विकासकामांची यादी, खर्चाचे तपशील, ग्रामसभांचे ठराव, उपस्थिती नोंदवही, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका (MB), उपयोगिता प्रमाणपत्रे (UC), तसेच कामांपूर्वी व नंतरचे छायाचित्रे आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा दावा
सध्याचे पदाधिकारी दिलीप मोजा पाडवी आणि मिठ्या वाहऱ्या पटले यांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्पष्ट केले आहे की, २०२२ ते २०२५ या त्यांच्या कार्यकाळात अंगणवाडी इमारत बांधकाम, गावांतर्गत सिमेंट रस्ते, शाळा दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना यांसारखी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांचे जिओ-टॅग फोटो, बिले आणि ग्रामसभेचे ठराव उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“चौकशीसाठी आम्हीही तयार”
सत्ताधारी गटाने स्वतःच्या कार्यकाळाचीही चौकशी करण्यास तयारी दर्शवली आहे. “आमच्या काळात झालेल्या प्रत्येक कामाचा हिशोब देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र २०१४ ते २०२१ या कालावधीत झालेल्या खर्चाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातूनच सत्य समोर येईल,” असे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खोटे आरोप केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
दरम्यान, कोणत्याही प्रकारचे खोटे किंवा बदनामीकारक आरोप सहन केले जाणार नसल्याचेही सत्ताधारी गटाने स्पष्ट केले आहे. चौकशीत गैरव्यवहार आढळला नाही तर खोटे आरोप करणाऱ्यांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष चौकशीकडे
सामान्यतः विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतात. मात्र घाटली ग्रामपंचायतीत सध्याच्या सत्ताधारी गटानेच जुन्या कारभाराच्या चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरले आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, चौकशीची प्रक्रिया कशी राबवली जाते आणि त्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण धडगाव तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









