बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीत उलटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) आणि सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात अन्य काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले.
या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.








