पाटण | प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील निसरे येथील कोयना नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ दिपक चव्हाण (वय १२) हा आपल्या वडिलांसोबत निसरे येथील कोयना नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेला होता. निसरे बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या पाणवठ्याजवळ तो नदीत आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.
ही बाब लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या काही मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला नदीकिनारी आणण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचविता आला नाही. आपल्या डोळ्यांसमोर मुलगा बुडाल्याचे पाहून वडिलांना मोठा धक्का बसला असून घटनास्थळी त्यांनी हंबरडा फोडला.
समर्थ हा आरेवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. अल्पवयात त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नदी, तलाव व बंधाऱ्यांमध्ये आंघोळ करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.










