माढेळी | प्रतिनिधी
राज्यातील शाळा दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून सुरू होणार असताना विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत विदर्भातील शाळा २२ जून २०२६ पासून सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाने २८ मार्च २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार विदर्भातील शाळाही उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विदर्भातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला कडक शब्दांत विचारणा करत, “विदर्भातील एवढ्या तीव्र उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवणार? त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला होता. न्यायालयाने शासनाला याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते.
न्यायालयाच्या भूमिकेनंतर तसेच शिक्षक संघटनांच्या वाढत्या मागण्यांचा विचार करून शासनाने निर्णयात बदल करत विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
याचिकाकर्त्यांनी २००७ आणि २०२३ मधील शासन निर्णयांचा आधार घेत विदर्भाच्या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीनुसार शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने २२ जून ही तारीख निश्चित केली आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कडक उन्हात शाळेसाठी करावी लागणारी पायपीट टळणार असून उष्माघाताचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.









