पैठण | प्रतिनिधी
आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली रक्कम परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका ठेवीदाराने थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. पैठण शहरातील नाका रोड परिसरातील गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेसमोर ठेवीदार गोविंद शेळके यांनी चक्री उपोषण सुरू केले आहे.
रवींद्रनगर येथील रहिवासी असलेले गोविंद शेळके यांनी मालवाहतूक वाहन चालवून मिळालेल्या उत्पन्नातून एक-एक पैसा साठवत सुमारे १० लाख रुपयांची ठेव संबंधित संस्थेत गुंतवली होती. अधिक व्याजदराच्या आशेने त्यांनी ही रक्कम पतसंस्थेत ठेवली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही त्यांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठेवीची रक्कम परत मिळावी आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, या मागणीसाठी शेळके यांनी संस्थेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून इतर ठेवीदारांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संबंधित संस्थेकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ठेवीदारांच्या मागण्यांकडे प्रशासन आणि संस्थेचे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










