पातूर | प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने चोंढी येथील निर्गुणा धरणातील पाणी कॅनॉलद्वारे अथवा नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ कापकर यांनी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निर्गुणा धरणामध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही आलेगाव व परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय परिसरातील पाळीव जनावरे तसेच रानटी प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
निर्गुणा धरणातील उपलब्ध पाणी कॅनॉलद्वारे अथवा नदीपात्रात सोडल्यास परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विहिरी व बोअरवेलना पाणी उपलब्ध होऊन आलेगावसह आसपासच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच नागरिकांसह पशुधनालाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे निलेशभाऊ कापकर यांनी नमूद केले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी आणि निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.










