महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वाळणे ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत अनागोंदी व अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाळणे गावात सुमारे सात वाड्या-वस्त्या असून कायमस्वरूपी लोकसंख्या सुमारे ७०० आहे. मात्र एप्रिल व मे महिन्यात ही संख्या १५०० ते १८०० पर्यंत वाढते. गावासाठी तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे २८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत गावात अर्धा इंच व एक इंच व्यासाच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. मात्र साठवण टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी आउटलेट पाइपचा वापर करण्यात येत असल्याने दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार आहे. तसेच योजनेची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीकडेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दलित वस्तीत १५व्या वित्त आयोगातून ४५ हजार रुपयांच्या पाइपलाइन कामाची नोंद असली तरी प्रत्यक्षात ते काम जलजीवन मिशनमधून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली असून त्यात केवळ दोन घरे व एका वस्तीसाठी दोन इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संपूर्ण गावात लहान व्यासाच्या पाइपलाइन असताना दोन घरांसाठी मोठ्या व्यासाची पाइपलाइन देण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच ही पाइपलाइन काही ठिकाणी सांडपाणी वाहणाऱ्या गटारातून टाकण्यात येत असल्याने भविष्यात गटारे साफसफाई करताना पाइपलाइनचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांनी जलजीवन मिशनच्या दोन्ही टप्प्यांतील कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्यालगतच्या गटारांवर टाकण्यात आलेले अनधिकृत भराव हटवून गटारे मोकळी करण्यात यावीत, जेणेकरून पावसाळ्यात शेतीचे नुकसान होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.










