कोपरगाव | प्रतिनिधी
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कोपरगाव तालुक्यातील रवंदे परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत वाळूने भरलेला डंपर आणि दुचाकीसह सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० जून रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून विक्रम बाजीराव आहेर (वय ३७) व पंढरी मसू आहेर (वय ४६, दोघेही रा. मुखेड, ता. येवला, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी घरकुल योजना व इतर बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना अधिकृत मार्गाने वाळू मिळत नसल्याने अनेक कामे रखडल्याचेही नागरिकांनी मांडले होते.
मात्र दुसरीकडे राजरोसपणे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे एलसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक आणि घरकुल लाभार्थी वाळूसाठी हेलपाटे मारत असताना दुसरीकडे वाळू माफिया बिनधास्तपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक कशी करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.










