कळंबोली | प्रतिनिधी :
कळंबोली परिसरातील सेक्टर-5E, सेक्टर-14 आणि सेक्टर-4 भागात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अखेर सोमवारी रात्री संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे घरगुती, व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामांवर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयाचा दूरध्वनीही बंद होत असल्याने तक्रारी नोंदविण्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येत कळंबोली येथील महावितरण कार्यालय गाठले. यावेळी “वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड आणि देखभाल कामांमुळे काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगत लवकरच परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्षात अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली.
सततच्या वीज समस्येमुळे कळंबोली परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
“सततच्या वीज बिघाडामुळे कळंबोलीकर त्रस्त; महावितरण प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.











