पनवेल-कळंबोली | प्रतिनिधी :
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील, विशेषतः कळंबोली आणि कामोठे परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दालनात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वीज समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक अमर पाटील, विकास घरत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे भेडसावणाऱ्या अडचणींबाबत उपस्थितांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी उपमहापौर प्रमिला पाटील यांनी ऊर्जा राज्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात कळंबोली सेक्टर १२ ते १५ मधील बीयूडीपी क्षेत्र तसेच एलआयजी व केएल-१ ते केएल-६ परिसरातील जुनी आणि जीर्ण झालेली वीज यंत्रणा तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली.
सुमारे दोन दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्या, खांब आणि फीडर पिलर्स कालबाह्य झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत आवश्यक तांत्रिक सुधारणा, नियमित देखभाल तसेच नवीन वीज वाहिन्या आणि फीडर पिलर्स उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी आणि नियोजनाद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पनवेलकरांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमुळे कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित वीज समस्यांच्या निराकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.











