कुरुंदवाड | प्रतिनिधी :
शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ४५ बर्ग्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पाटबंधारे विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जूनच्या रात्री परिसरात जोरदार वळवाचा पाऊस झाला होता. याच दरम्यान कुरुंदवाड-शिरोळ मार्गावरील पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून ३० लोखंडी आणि १५ लाकडी असे एकूण ४५ बर्गे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
चोरीस गेलेल्या लोखंडी बर्ग्यांचे वजन प्रत्येकी सुमारे २० ते २१ किलोपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वजनदार साहित्याची चोरी करण्यासाठी संघटित टोळी तसेच वाहनाचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही या बंधाऱ्यावरून बर्ग्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिकांच्या मते, बंधाऱ्यावर सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था असली तरी तो केवळ दिवसा कार्यरत असतो. रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने चोरट्यांना संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. घटनेच्या रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि निर्मनुष्य परिसर यामुळे चोरी सुलभ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर बंधाऱ्यावर रात्रपाळीसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाटबंधारे विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या तपासानंतर चोरीमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











