वर्धा, दि. 10 (जिमाका)
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा विशेष जनसंवाद कार्यक्रम शनिवार, दि. 13 जून रोजी दुपारी 3 वाजता देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. भोयर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या तसेच विविध विकासकामांबाबतच्या सूचना जाणून घेणार आहेत.
जनतेशी थेट संपर्क ठेवून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याची भूमिका सातत्याने मांडणारे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जनता दरबार व जनसंवाद उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपली समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमास आमदार राजेश बकाणे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून तत्काळ चर्चा होऊन आवश्यक उपाययोजनांना गती मिळणार आहे.
जनसंवादादरम्यान पालकमंत्री डॉ. भोयर महसूल, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी व अडचणी जाणून घेणार आहेत. प्राप्त तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत.
नागरिकांना आपले प्रश्न मांडता यावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने वर्धा व देवळी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा जनसंवाद उपक्रम नागरिक व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.






