अहेरी | प्रतिनिधी
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी-चान्ना येथील ७२ वर्षीय सौ. गंगाबाई बारसे या आजही आपल्या कष्टाळू वृत्तीमुळे परिसरात स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. गावात त्यांच्याकडे प्रेमाने आणि आदराने “अम्मा” म्हणून पाहिले जाते.
औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करून समाजात सक्षम व जागरूक नागरिक म्हणून घडविले आहे. कष्ट, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणाचा वारसा मुलांमध्ये रुजविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे.
वयाच्या ७२ व्या वर्षीही अम्मा स्वतः गाईंचे दूध काढून दुग्ध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलांकडून वारंवार विश्रांती घेण्याचा आग्रह केला जातो, मात्र त्या हसत म्हणतात, “रिकामा क्षण आयुष्यात निराशेचे धन असतो; कामात मन रमले की आनंदाचे क्षण मिळतात.”
स्वावलंबनाचा संदेश देताना त्या नेहमी सांगतात की, “माणसाने आपल्या गरजांपुरते काम केले पाहिजे. श्रमामुळे शरीर निरोगी राहते आणि आत्मसन्मान टिकून राहतो.” त्यांच्या मते बेरोजगारी ही केवळ परिस्थिती नसून मनाची अवस्था आहे. कोणतेही काम लहान नसते आणि श्रमाची लाज बाळगू नये, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
गावातील सरपंच डॉ. सचिन डोंगरे, कोतवाल शरद रामटेके, ठेकेदार हेमू फुंडे, महाजन गोपाल बहेकार आणि व्यापारी गणेश ब्राम्हणकर यांनी अनेकदा त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र गंगाबाई बारसे उलट त्यांनाच स्वावलंबी राहण्याचा आणि सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतात.
“आईची घडण देही, बाळाला वळण” या उक्तीप्रमाणे मुलांच्या संगोपनात संस्कारांचे महत्त्व त्या नेहमी अधोरेखित करतात. त्यांच्या मते, चांगले नागरिक घडविण्याची पहिली जबाबदारी आईचीच असते.
कष्ट, स्वाभिमान, स्वावलंबन आणि संस्कार यांचा अनोखा संगम असलेल्या गंगाबाई बारसे या आजच्या तरुण पिढीसह बेरोजगारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासातून श्रमप्रतिष्ठा आणि आत्मनिर्भरतेचा मौल्यवान संदेश समाजाला मिळत आहे.








