मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या निधीचा वापर करण्यात येत असून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला निधी इतरत्र वळविला जात असल्याचा आरोप उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, समाज कल्याण विभागाचे सुमारे 344.74 कोटी रुपये एका शासन निर्णयाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
उत्कर्षा रूपवते यांनी आरोप केला की, लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी सातत्याने समाज कल्याण विभागाचा, विशेषतः अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला निधी वळविण्यात येत आहे. त्यामुळे विभागाच्या मूळ योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारने समाज कल्याण विभागाच्या योजनांचे नियोजन करण्याऐवजी केवळ लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यावर भर दिल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राज्यावर 11 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज असल्याचा उल्लेख करत आर्थिक नियोजनाशिवाय निधीचे पुनर्विनियोजन करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या या धोरणावर टीका करण्यात आली असून सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा वापर मूळ उद्दिष्टांसाठीच करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
