“दारू धंदे बंद करा, अन्यथा कोळेगावला ‘दारुड्यांचे गाव’ घोषित करा” – महिलांचा इशारा
कोळेगाव | प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे वाढत्या वैध-अवैध दारू व्यवसायाविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून गावातील अवैध दारू धंदे, हातभट्टी, मटका, गांजा विक्री तसेच परमिट रूम तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी प्रवीण सावंत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ८७० महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात गावातील वाढत्या दारू व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दारूच्या आहारी गेलेल्या काही व्यक्तींमुळे महिला आणि मुलींना सुरक्षितपणे वावर करणे कठीण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गाव पूर्णपणे दारूमुक्त करण्यासाठी विशेष मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच परवानाधारक आणि अवैध दारू व्यवसायांवर कायमस्वरूपी निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही दारू विक्रीचे प्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महिलांनी कष्टाने कमावलेले पैसे दारूसाठी हिसकावून घेणे, मारहाण करणे आणि धमकावणे असे प्रकार वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करून गावातील वैध व अवैध दारू धंदे तसेच परमिट रूम बंद कराव्यात, अन्यथा भविष्यात कोळेगावला “दारुड्यांचे गाव” म्हणून घोषित करण्याची वेळ येईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.
दरम्यान, निवेदनातील आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे गावकऱ्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
