माढेळी | प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रोख रक्कम सोबत बाळगण्याऐवजी नागरिक मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. किरकोळ दुकानांपासून मोठ्या व्यावसायिक व्यवहारांपर्यंत फोनपे, गुगल पे, यूपीआय आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर वाढत आहे. मात्र, डिजिटल व्यवहारांबरोबरच सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माढेळी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात आरबीआयशी संलग्न जनजागृती उपक्रमांतर्गत श्री. पांडुरंग गावंडे यांनी ग्रामस्थांना डिजिटल पेमेंटविषयी सविस्तर माहिती दिली. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट लिंक, ओटीपी शेअर करण्याचे धोके, फेक कॉल्स आणि यूपीआय व्यवहारांमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा यूपीआय पिन देऊ नये, तसेच संशयास्पद संदेश आणि लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी डिजिटल पेमेंटविषयी उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले. तसेच सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अधिक जागरूक राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत विश्वास वाढण्यास मदत झाली असून, आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

