अंबरनाथ | प्रतिनिधी
यंदाच्या शैक्षणिक वर्षात विविध शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघटना अंबरनाथ शहर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या व शैक्षणिक साहित्य किट देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळू शिंदे, सचिव अरुण संकटे, श्रीधर लिंगम, वेंकटेश गट्टेगला, अंबरनाथ शहराध्यक्ष बंडू नागवंशी, लक्ष्मी कोली, वसई शहराध्यक्ष वैभव मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख केला. शिक्षणाच्या बळावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून देशाला नवी दिशा दिली. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” या विचाराचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन समाज व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.
तसेच, भारतीय राज्यघटनेमुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले असून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवाधिकारांचे मूल्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी श्रीधर लिंगम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



