कुरुंदवाड प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील कृष्णा-दुधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस टाकळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत विशेष ग्रामसभेत एकमताने विरोधाचा ठराव मंजूर केला.
दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना इचलकरंजी शहराची पाणी योजना स्थानिक भागावर लादल्यास परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासंदर्भात विशेष ग्रामसभा बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासक रवी कांबळे यांच्या आदेशाने व उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामसेवक मुल्ला यांनी सभेचे स्वागत केले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, रणजीत पाटील, बी. एस. पाटील आणि अमर पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
ग्रामसभेत बोलताना उपस्थितांनी सांगितले की, राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राची पाण्याची हद्द संपते. दुधगंगा नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. टाकळी गावातील लोकांनी काळमवाडी धरणासाठी जमिनी दिल्या, मात्र आजही गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. दरवर्षी पिके वाळतात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.
इचलकरंजी शहराच्या प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. टाकळी गावाने नुकतीच दुधगंगा नदीवर नवीन पेयजल योजना सुरू केली असून, प्रस्तावित योजनेमुळे त्या योजनेलाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
यापूर्वी कुरुंदवाड येथून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यात आला होता. पुन्हा शिरोळ तालुक्यातून पाणी मागणे योग्य नसल्याचा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
ग्रामसभेत “आमच्या हक्काचे पाणी देणार नाही” अशा घोषणा देत राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संभाजी पाटील, श्रीधर भोसले, विजय पाटील, संतोष गायकवाड, नवनाथ पाटील, रोहन पाटील, तातोबा शिरहट्टी, अरुण पाटील, आनंदराव पाटील, किरण पाटील, संजय पाटील, सुशील पाटील, धनाजी पाटील, रणजीत पाटील, सागर पाटील, अजित पाटील, शशिकांत कदम, रोहित शिरहट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
