कुरुंदवाड | प्रतिनिधी :
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर सुरू असलेले प्राणांतिक उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. तसेच पंचगंगा नदीकाठावरील गावांमध्ये बुधवारी जाहीर करण्यात आलेले चक्काजाम आंदोलनही स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी दिली.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती सर्वपक्षीय व सर्व संघटना कृती समिती आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवारी मजरेवाडी येथील इचलकरंजीच्या कृष्णा पाणी योजना केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देत आंदोलन करण्यात आले होते. कुरुंदवाड येथील नगरपरिषद चौकात आंदोलनकर्ते जमले असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापटही झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना नंतर सोडून दिले.
यानंतर आंदोलनकर्ते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांच्यात बैठक झाली. मात्र, “काळा ओढा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पक्का बांध घालावा” तसेच “प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी पर्यायी जमीन उपलब्ध होईपर्यंत संबंधित प्रोसेस पूर्णपणे बंद ठेवाव्यात” या प्रमुख मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले होते.
मंगळवारपासून पंचगंगा नदीकाठावरील विविध गावांतील शेतकरी व नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी नदीकाठावरील सर्व गावांमध्ये चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी २२ आणि २३ जून रोजी इचलकरंजी येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, प्रोसेस मालक, आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत संबंधित प्रोसेसधारकांकडून रासायनिक पाणी सोडण्यात येणाऱ्या शेती क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच २५ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या लेखी आश्वासनानंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच बुधवारी होणारे चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही धनाजी चूडमुंगे यांनी यावेळी दिला.
