पुरंदर | प्रतिनिधी :
“स्वस्थ मिट्टी, सशक्त किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित ‘खेत बचाओ अभियान’ तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मौजे बोपगाव (ता. पुरंदर) येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि शेती प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण व मंडळ कृषी अधिकारी (सासवड) रवींद्र खेसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी विजय जाधव यांनी केले होते.
कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी, हवामान बदलाचे परिणाम, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (द्राक्ष संशोधन केंद्र) येथील डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. मदनकर मॅडम आणि श्री. कांबळे (टी.ओ.) यांनी बदलत्या हवामान परिस्थितीत शेती व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
तर अखिल भारतीय कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र, जाधववाडी येथील डॉ. प्रदीप दळवे आणि डॉ. युवराज बालगुडे यांनी सीताफळ बहार व्यवस्थापन, ‘एल निनो’ची पार्श्वभूमी, त्याचे शेतीवरील संभाव्य परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबाबत माहिती दिली.
कृषी विभागाच्या वतीने सासवडचे उप कृषी अधिकारी गणेश जगताप आणि दिवे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी कोंडीबा जरांडे यांनी खरीप पिकांची निवड, पाण्याचा योग्य वापर आणि खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
पाणी फाउंडेशनचे मेंटॉर व उप कृषी अधिकारी कदम साहेब तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे यांनी पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत शाश्वत शेतीसाठी जलसंधारणाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. हुमणी अळी नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ (Light Trap) वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच BBF (रुंद वरंबा सरी) आणि गादी वाफ्यावर टोकन यंत्राद्वारे बियाणे पेरणी करण्याची आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायत बोपगाव, राजलक्ष्मी व राजनंदिनी महिला बचत गट, कालभैरवनाथ आदेश पुरुष बचत गट तसेच परिसरातील शेतकरी बांधव व भगिनी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

