माधव नगर परिसरातील नागरिकांनी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगर-कल्याण रोड परिसरातील माधव नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील कचरा आणून टाकला जात असून, काही दिवसांनी तो कचरा पेटवून दिला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारा धूर अत्यंत भयंकर असतो आणि दोन ते तीन तास परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांना मानसिक तसेच आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा महापालिका आयुक्तांकडे निवेदने देऊन तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी उपायुक्तांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.
या वेळी नगरसेवक महेश लोंढे यांच्यासह राम अंधारे, पप्पू बेरड, निलेश ठुबे, सागर धरम, सुरेश अंधारे, सार्थक भागवत, शुभम पगारे, बबन पवार, अक्षय ढवळे आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
