राजकुमार इकडे यांची सामाजिक, पत्रकारिता आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत बी द चेंज फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील राजणगाव रोड येथील रहिवासी असलेल्या राजकुमार इकडे यांनी गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी शिर्डी येथे होणार असून, त्या वेळी त्यांचा सन्मान ट्रॉफी, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, विशेष भेटवस्तू तसेच पारंपरिक महाराष्ट्रियन फेटा प्रदान करून करण्यात येणार आहे.
अभिषेक तुपे यांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्राद्वारे राजकुमार इकडे यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
