दोडामार्ग / प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील भोमवाडी भागात मुख्य रस्त्यालगत असलेल्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भोमवाडी परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यामुळे रस्त्यालगत खोल भगदाड निर्माण झाले असून, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात ही जागा वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्यास दुचाकी अथवा चारचाकी वाहने थेट या भगदाडात कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, या भगदाडामुळे रस्त्याचा काही भागही खचू लागला असून भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांची ये-जा असते. त्यामुळे तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पाटबंधारे विभागाकडून अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स किंवा इशारा फलकही लावण्यात आलेले नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल भोमवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
संबंधित पाटबंधारे विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
