शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येताच प्रशासनाची तातडीने दखल; नागरिकांकडून समाधान व्यक्त
नेरूळ, दि. १७ : सारथी महाराष्ट्राचा न्यूज च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथवरील अडथळे हटविण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यात आला आहे.
तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील फुटपाथवर झाडांच्या तोडलेल्या फांद्या तसेच इतर कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. हा गंभीर प्रश्न सारथी महाराष्ट्राचा न्यूज ने वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
शाळा सुरू झाल्यानंतर दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक लहान मुले याच फुटपाथवर रांगेत उभी राहत असल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत होती. फुटपाथ अडथळ्यांनी व्यापल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
लोकहिताचा हा प्रश्न प्रकाशझोतात आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत झाडांच्या फांद्या व कचऱ्याचा ढिगारा हटवून फुटपाथ पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला केला. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निमित्ताने लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, परिसरातील नागरिकांनी प्रशासनासह सारथी महाराष्ट्राचा न्यूज चे आभार मानले आहेत.
— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज
