रिसोड प्रतिनिधी
रिसोड शहराची तहान भागवणाऱ्या आडोळ धरण मध्ये सध्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने तसेच उन्हाळ्यातील वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
रिसोड नगरपरिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्याचा जलसाठा लक्षात घेता पुढील १५ दिवसांपेक्षा अधिक काळ नियमित पाणीपुरवठा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शहरात सहाव्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पावसाळा आणखी लांबल्यास हा कालावधी आठ दिवसांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, धरणात कमी पाणी असतानाही शहरातील काही भागांत नळांना तोटे नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांकडून रस्ते धुणे, वाहन स्वच्छ करणे यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने अशा गैरवापरावर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी पुढे येत आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आतापर्यंत रिसोडकरांना नियमित पाणीपुरवठा होत होता, मात्र आता परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.”
शहरातील नागरिकांकडून सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात फिरून पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जनजागृती करावी, तसेच पाणी गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपक लावून पाणी बचतीबाबत सूचना देण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.
येत्या ८ ते १० दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर रिसोडकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे “पाणी वाचवा” हीच सध्याची सर्वात मोठी गरज बनली असून, नागरिकांनी पाणी जपून वापरणे अत्यावश्यक ठरत आहे.
