परळी प्रतिनिधी :
परळी शहरात आज दिवसभर अफवेमुळे पानटपरी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील नव्याने नियुक्त झालेले कडक प्रशासनशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे परळी शहरात आले असून विविध ठिकाणी धाडी टाकत असल्याची अफवा शहरभर वेगाने पसरली होती.
या अफवेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक पानटपरी धारकांनी आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली. काही व्यावसायिकांनी संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकान बंद करून परिसरातून निघून गेल्याचेही दिसून आले. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पानटपऱ्यांवर पूर्णपणे सुकसुकाट पाहायला मिळाला.
दरम्यान, या प्रकरणाची पडताळणी करण्यात आल्यानंतर शहरात अन्न भेसळ, गुटखा बंदी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अधिकृत कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित विभागाकडून दिवसभरात कोणतीही धाड टाकण्यात आलेली नसून ही केवळ अफवा असल्याचे समोर आले.
अफवेच्या आधारे शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीची नागरिकांमध्येही चर्चा रंगली होती. काही व्यापाऱ्यांनी “अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे,” असे मत व्यक्त केले.
