भोकरदन प्रतिनिधी :
भोकरदन :- भोकरदन-दानापूर मार्गावरील भाईडी गावाजवळ आज भीषण अपघात घडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक पिकअप वाहन देहेडकडे जात होते, तर ट्रक मिक्सर मशीन दानापूरहून भोकरदनकडे येत होते. भाईडी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअपमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. मात्र, संभाजीनगरकडे नेत असताना गंभीर जखमी असलेले ज्ञानेश्वर जनार्धन भुतेकर (वय 30 वर्ष) आणि प्रसाद संतोष शेळके (वय 16 वर्ष) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
या अपघातात ऋतुजा गजानन बावस्कर (वय 17 वर्षे) आणि वेदिका संजय शेळके (वय 11 वर्षे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या भीषण अपघातामुळे भाईडी परिसरासह संपूर्ण भोकरदन तालुक्यात शोककळा पसरली आहे.
