नाशिक प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. पक्षातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकेची राज्यभर चर्चा होत असून, एका भावनिक क्षणामुळेही ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी वाट धरल्याची चर्चा सुरू असताना, या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फुटीच्या वादळातही पक्षनिष्ठा जपणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
नाशिकमधून प्रथमच लोकसभेत पोहोचलेल्या राजाभाऊ वाजे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची वेगळी छाप निर्माण केली आहे. कांदा, द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, सिंहस्थ मेळा २०२७, गोदावरी नदी प्रदूषण, विमानसेवा आणि लॉजिस्टिक यांसारखे महत्त्वाचे विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडले असून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, “मी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. भविष्यातही ठाकरे आणि पक्षासोबतच कायम राहणार आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. इतर सहकारी खासदारांबाबत मला काहीही माहिती नाही.”
राजाभाऊ वाजे यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर त्यांच्या वडिलांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या उद्धव साहेबांनी माझ्या मुलावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. मुलाने पक्षनिष्ठा जपली याचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत प्रकाश वाजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने बदल होत असताना राजाभाऊ वाजे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नाशिकच्या राजकीय वर्तुळातही या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.
