शहादा, दि. 17 (प्रतिनिधी)
शहादा येथील महावितरण कार्यालयाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अवाजवी वीज बिल, स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्प वीज वापर असतानाही अनेक ग्राहकांना 5 ते 10 हजार रुपयांपर्यंतची वीज बिले येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वेळा मीटर रीडिंग न घेता “चालू रीडिंग उपलब्ध नाही” असा शेरा देऊन अंदाजे बिले पाठवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
100 युनिटच्या पुढे अतिरिक्त युनिट दाखवून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत ग्राहकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच परस्पर बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या रीडिंगबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
सौर ऊर्जा (सोलर पॅनल) बसवलेल्या ग्राहकांनाही अपेक्षित शून्य बिल न येता 6 ते 7 हजार रुपयांपर्यंतची बिले आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे “सौर ऊर्जेलाही महावितरणकडून झटका” अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना कार्यालयात मिळणारी वागणूक अत्यंत उर्मट असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, बसण्याची गैरसोय आणि अर्जांवर वेळेत कार्यवाही न होणे यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक लक्ष्मण हिरालाल कदम यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून, अन्याय दूर होईपर्यंत वीज बिल न भरण्याचा तसेच महावितरण कार्यालयावर घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
