सांगली – तासगाव प्रतिनिधी :
श्री शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्व तसेच वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे श्री सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि लोकहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला आहे. वंचित समाजघटकांचे हक्क, महिला शोषण, हुंडाबळी, हुंडा छळ, बालमजुरी, बालविवाह, जातीभेद, जातीय हिंसाचार, बेकायदेशीर कृत्ये, भ्रष्टाचार, तसेच मूलभूत अधिकारांचे उल्लंघन अशा अनेक गंभीर सामाजिक समस्यांवर त्यांनी सक्रियपणे काम केले आहे.
पोलीस यंत्रणेकडून होणारी कथित मनमानी, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत केसेसचे निराकरण, सरकारी जागेवरील अतिक्रमणांचे नियमितीकरण, वनजमिनीवरील दलित वसाहतींचा प्रश्न, तसेच “डि-फॉरेस्टेशन (Disforest) मोहीम” राबवून भूमिहीन व बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
त्याचबरोबर भूमिहीन व बेघर नागरिकांना सरकारी जमीन उपलब्ध करून देणे, त्यावर घरकुल मिळवून देणे, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभावी लाभ मिळवून देणे, तसेच दलित वस्ती विकास आराखडा समाजकल्याण विभागामार्फत राबवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
“वस्ती जिथे अंगणवाडी तिथे” हा पॅटर्न दलित वस्त्यांमध्ये राबविणे, वाड्या-वस्त्यांमध्ये वीजपुरवठा, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, लाईट व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच सबळीकरण योजनेअंतर्गत भूमिहीनांना शासकीय जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे.
समाजजागृतीसाठी समाजमंदिरे, संविधान सभागृहे, सभामंडप उभारणी, तसेच रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उभारणे यावरही त्यांनी भर दिला आहे. सामाजिक उपक्रम व लोकहिताच्या योजना राबवून त्यांनी समाजातील जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे.
मानवाधिकार संघटना (MASSO) तसेच भारतीय प्रशासनिक जन सुधार शिकायत परिषद, दिल्ली या संस्थांच्या माध्यमातून ते दक्षता अधिकारी (नॅशनल कमिटी) म्हणून कार्यरत असून त्यांचे कार्य संपूर्ण भारतभर पोहोचले आहे.
या कार्याची दखल घेत अमेरिकास्थित ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीने दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी पुद्दुचेरी येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. या कार्यक्रमासाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
या सन्मानामुळे तासगाव (सांगली), जरंडी, खानापूर (विटा), करंजे, माहुली (आटपाडी), नेलकरंजी तसेच पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
