कळवण : तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून झालेल्या सचिन चोरे यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना कळवण न्यायालयाने २० जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृत सचिन चोरे यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून सचिन चोरे यांचा खून झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी योगेश बागुल, प्रकाश बागुल आणि संदीप पवार यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. १५ जून रोजी आरोपींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपींना सुरक्षितस्थळी हलविले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना देवळा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
मृत सचिन चोरे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कळवण पोलीस ठाण्यातही नातेवाईकांनी उपस्थित राहत संताप व्यक्त केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढत तपास निष्पक्षपणे सुरू असल्याचे सांगितले.
१६ जून रोजी दुपारी तिन्ही आरोपींना कळवण न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलेल्या युक्तिवादात खून प्रकरणातील विविध पैलूंची चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आरोपींच्या मोबाईलमधील संवाद, व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील पुरावे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या साहित्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगण्यात आले.
न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य धरत तिन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या कालावधीत आरोपींची कसून चौकशी करून खुनामागील नेमके कारण, कटातील सहभाग आणि इतर संबंधित बाबींचा तपास केला जाणार आहे.
कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोंद्रे देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश शेवाळे, संदीप बहिरम, पोपट महाले, पंकज शेवाळे व पुंडलिक डबळे हे पुढील तपास करीत आहेत.
या खून प्रकरणामुळे कन्हेरवाडीसह संपूर्ण कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
