प्रतिनिधी :
औराळा येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी तसेच स्मार्ट मीटरविरोधात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी विविध शासकीय विभागांना निवेदन देत शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
रासायनिक खतांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र खत विक्रेत्यांना ऑनलाइन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खत नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.
महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांना संदेश पाठवले जात असून, जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नयेत, असा इशाराही यावेळी देण्यात आला. “स्मार्ट मीटर बसवायचे असतील तर नागपूरपासून सुरुवात करा, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका,” अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
याशिवाय मागील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी तसेच मागणी नसताना घरगुती विजेचे स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
हे निवेदन तालुका कृषी अधिकारी, पीकविमा कंपनी, छत्रपती संभाजीनगर तसेच कन्नड येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राठोड साहेब यांना देण्यात आले.
यावेळी देवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे साहेब, भिसे साहेब, पोलीस निरीक्षक सलीम शहा, कांबळे साहेब आणि बढेकर साहेब उपस्थित होते.
