नवी दिल्ली : येत्या २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (यूजी) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पेपरफुटी आणि फसवणुकीच्या अफवांना आळा घालण्यासाठी २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांच्या शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९अ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून हे निर्बंध लागू केले आहेत.
एनटीएने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, गेल्या काही काळात टेलिग्रामद्वारे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या अफवा, बनावट प्रश्नपत्रिका आणि चुकीची माहिती पसरवली जात होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिशाभूल करून हजारो ते लाखो रुपये उकळण्याचे प्रकार समोर आले होते.
या संदर्भात एनटीए आणि विविध राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सविरोधात कारवाई केली होती. मात्र स्वतंत्रपणे चॅनेल्स बंद करूनही गैरप्रकार पूर्णपणे थांबत नसल्याने अखेर प्लॅटफॉर्म स्तरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
एनटीएने या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्बंधांचा काही प्रमाणात सर्वसामान्य वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो, याची कबुली संस्थेने दिली असली तरी परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, २१ जून २०२६ रोजी होणारी नीट पुनर्परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवा, बनावट संदेश किंवा अप्रमाणित माहितींकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
