नेर प्रतिनिधी
नेर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईमुळे नेर शहरासह तालुक्यातील पानटपरी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अनेक पानटपरी चालकांनी आपल्या टपऱ्यांचे शटर खाली करत व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ आणि दारव्हा परिसरात झालेल्या कारवाईनंतर नेर तालुक्यातील व्यवसायिक अधिक सतर्क झाले असून, नेमके कोणत्या वस्तू विक्रीस ठेवाव्यात आणि कोणत्या विकू नयेत याबाबत स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने व्यापारी संभ्रमात सापडले आहेत.
रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांवरील बंदी व त्यासंदर्भातील कठोर कारवाईची माहिती सर्वांनाच असली, तरी कोणत्या वस्तूंवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तू कायदेशीररित्या विकता येतात, याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
काही व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मोठ्या पुरवठादारांवर कारवाई न होता किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाईचा अधिक फटका बसत आहे.” त्यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाची मोहीम आवश्यक असल्याचे नागरिकांकडून मान्य करण्यात येत असले, तरी नियम आणि विक्रीस मान्य असलेल्या वस्तूंबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
व्यवसायिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, पानटपरी चालकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन शिबिरे घेऊन अधिकृत यादी जाहीर करावी, जेणेकरून गैरसमज टळतील आणि छोट्या व्यवसायिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही.
