पहाटेच्या आगीत १७ म्हशी, १ गाय व ७ वासरांचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
दिनांक : १८ जून २०२६ | खेड प्रतिनिधी
खेड : तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे दगावली असून दोन म्हशींना वेळेत बाहेर काढून जीवदान देण्यात यश आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास रजवेल मोहल्ला येथील गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोठ्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे गोठ्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही.
घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग आसपासच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
मात्र, तोपर्यंत गोठ्यातील १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला होता. दोन म्हशींना मात्र वेळेत बाहेर काढून वाचविण्यात यश मिळाले. मृत झालेल्या जनावरांच्या किमतीचा विचार करता पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, एका क्षणात अनेक जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले असून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
