मुंबई येथे ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न
परभणी | प्रतिनिधी :
मुंबई येथे रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी आरंभ हॉलमध्ये ‘बी दि चेंज फाउंडेशन’ आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा मोठ्या उत्साहात, दिमाखदार वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात देशातील विविध राज्यांतील गुणी, कर्तव्यनिष्ठ, समाजाभिमुख तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
शिक्षक हे समाजाची भावी पिढी घडविणारे खरे शिल्पकार असून त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, समर्पण आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान व्हावा या उद्देशाने ‘बी दि चेंज फाउंडेशन’तर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
यंदाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ नेताजी सुभाष विद्यालय, मानवत येथील सौ. कुसुम दशरथ कनकुटे यांना प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि समाजाभिमुख उपक्रमांची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सुमित रेवरी, सन्माननीय रुक्मिणी गलांडे, अभिनेत्री सौ. निवेदिता पगार तसेच श्री. अमृत रोहोम उपस्थित होते. याशिवाय ‘बी दि चेंज फाउंडेशन’चे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून अशा पुरस्कारांमुळे त्यांना अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळते.”
या सन्मानामुळे सौ. कुसुम कनकुटे यांच्या कार्याची विविध स्तरांतून प्रशंसा होत असून, भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार अधिक प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
