धारणी | दि. १६ जून २०२६
समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मेळघाटातील सुमारे २५० शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला (IAS), सहाय्यक वनसंरक्षक सुमित कुमार (IFS) आणि तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव उपस्थित होते. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. लांडे, डॉ. सचिन शिंदे, श्री. माने आणि डॉ. मते यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रगती सहयोगचे श्री. स्वामी डूरके यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संस्थेच्या व कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या संयुक्त उपक्रमांचा आढावा घेतला. मागील रब्बी हंगामात २०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो हरभरा बियाणे तसेच ३० कृषी पंपांचे वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, हा केवळ बीज वाटप कार्यक्रम नसून “बीज मदत कार्यक्रम” आहे. या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकरी भगिनींनी पुढील वर्षी स्वतःच्या उत्पादनातून काही बियाणे इतर गरजू शेतकरी महिलांना देऊन या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत १८५ शेतकऱ्यांना लाल तूर, तर ५० शेतकऱ्यांना सोयाबीन, राळा, कुटकी आणि नाचणी या पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. धारणी तालुक्यातील सुमारे ४५ गावांमधील १५० महिला आणि ५० पुरुष शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी बियाण्यांची प्रक्रिया, उगवणक्षमता आणि खरीप हंगामात घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, योग्य पावसाची प्रतीक्षा करूनच शेतीची कामे सुरू करावीत, असे आवाहन केले. तसेच धारणी येथे लवकरच एपीएमसी बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी मार्गदर्शन करताना मेळघाटातील कुपोषण, बालविवाह, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विषयांवर भाष्य केले. कोरकू आदिवासी समाजाची पारंपरिक शेतीपद्धती जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. पोषणमूल्य असलेल्या पारंपरिक पिकांची लागवड वाढवून पोषण सुरक्षा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
सहाय्यक वनसंरक्षक सुमित कुमार यांनी जंगल हे आदिवासी समाजाचे पारंपरिक संसाधन असल्याचे सांगत त्याचा शाश्वत वापर आणि संवर्धनासाठी ग्रामसभांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांनी “हमारा स्वास्थ्य हमारी जिम्मेदारी, कुपोषण मुक्त मेळघाट हमारी भागीदारी” अशी घोषणा देत कुपोषणमुक्त मेळघाट घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास समाज प्रगती सहयोगचे कमलजी, सूरज, देवेंद्र, साक्षी, रामदास तसेच संस्थेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
