जालना प्रतिनिधी
जालना : संपूर्ण जालना जिल्ह्यात सध्या चिल्लर पैशांचा मोठा तुटवडा जाणवत असून व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः ५, १० आणि २० रुपयांची नाणी तसेच १०, २० आणि ५० रुपयांच्या चांगल्या नोटा बाजारात सहज उपलब्ध होत नसल्याने व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
अनेक ठिकाणी फाटलेल्या किंवा खराब नोटा ग्राहकांकडून स्वीकारल्या जात नसल्याने दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. किरकोळ व्यवहारांमध्ये चिल्लर नसल्यामुळे व्यापाऱ्यांना ग्राहकांना उर्वरित रक्कम परत देताना अडचणी येत असून अनेकदा शाब्दिक चकमकीही होत आहेत.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजारात पुरेशा प्रमाणात नाणी आणि छोट्या नोटांचा पुरवठा होत नसल्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. काही जणांकडून चिल्लर जास्त दराने देण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली जात असल्याचीही चर्चा बाजारपेठेत सुरू आहे. त्यामुळे “चिल्लर नेमकी गायब कुठे झाली?” असा प्रश्न व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः किराणा दुकाने, भाजी विक्रेते, चहाचे स्टॉल, पानटपऱ्या आणि छोटे व्यावसायिक यांना या समस्येचा अधिक फटका बसत आहे. ग्राहकांकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्यास व्यवहार अधिकच कठीण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने तसेच बँकांनी बाजारात छोट्या नोटा आणि नाण्यांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.
