लातूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (NTA) २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारी ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असून परीक्षा केंद्रांवरील सर्व सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आरोग्य सुविधा काटेकोरपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने आणि दक्षतेने काम करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, तहसीलदार राजाभाऊ कदम, आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड, जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड, महेश सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात यंदा एकूण २६ परीक्षा केंद्रांवर ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा होणार आहे. यामध्ये लातूर शहरातील १९, अहमदपूरमधील २, उदगीरमधील २, निलंग्यातील २ आणि चाकूर तालुक्यातील चापोली येथील १ परीक्षा केंद्राचा समावेश आहे.
परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून ‘ड्युटी मॅजिस्ट्रेट’ आणि ‘स्टेट ऑब्झर्वर’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथके तैनात राहणार असून आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या दिवशी शहरात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार जादा बसेस चालवाव्यात तसेच बसस्थानक ते परीक्षा केंद्रांपर्यंत विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराबाहेरील परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बस सुविधा उपलब्ध राहील, याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन नेण्यास परवानगी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून कोणीही मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय, श्री शाहू महाविद्यालय आणि जयक्रांती महाविद्यालय या परीक्षा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्था व उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड आणि महेश सूर्यवंशी उपस्थित होते.
