प्रतिनिधी :-
कुरुंदवाड : शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन कुरुंदवाड नगरपालिकेने भटकी कुत्री पकडण्याची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण १९७ भटक्या कुत्र्यांना पकडण्यात नगरपालिकेला यश आले आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या कुत्र्यांमध्ये ९१ नर आणि १०६ मादी कुत्र्यांचा समावेश आहे. या सर्व कुत्र्यांचे नियमानुसार लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे तसेच रेबीजसारख्या आजारांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या कानाचा थोडा भाग कातरला जात आहे. त्यामुळे कान कातरलेले कुत्रे दिसल्यास त्यांचे निर्बिजीकरण झाले असल्याचे समजावे, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
ज्या भटक्या कुत्र्यांच्या कानाचा भाग कातरलेला नाही, अशा कुत्र्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात ही योजना बंद होण्याची शक्यता असल्याने शहरातील नागरिकांनी जागरूक राहून सहकार्य करावे, असे आवाहन महिला नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे यांनी केले आहे.
नगरपालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होत असून नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
