नवी दिल्ली : NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भारतात टेलिग्राम ॲपवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. परीक्षा प्रक्रियेत होणारी फसवणूक, पेपरफुटीच्या अफवा आणि बनावट माहितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ए अंतर्गत केंद्र सरकारने टेलिग्रामच्या वापरावर २२ जून २०२६ पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. NEET-UG पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार असून, परीक्षा आणि त्यानंतरच्या कालावधीत सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, टेलिग्रामवरील आधीच पाठवलेल्या संदेशांमध्ये बदल करण्याची (Message Editing) सुविधा देखील ३० जून २०२६ पर्यंत भारतात बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बनावट “पेपर लीक”चे पुरावे तयार होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने बिहार, गुजरात आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने अनेक संशयास्पद टेलिग्राम चॅनेल्स आणि बॉट्सवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे NTA ने म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानेही २२ जूनपर्यंतच्या या तात्पुरत्या निर्बंधांना मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.
